Monday 26 September 2011

ताई तुम्ही ''जय महाराष्ट्र'' म्हणाल का?


एका वाचक भावासोबत झालेला संवाद 

माझे वाचक मला विविध प्रकारचे प्रश्न विचारतात. काहींच्या मनात प्रश्न असतात. तर काही जण अमूक विषयावर लिहा म्हणून आग्रह धरीत असतात. एका वाचने मला प्रश्न केला की, तुम्ही संभाजी ब्रिगेड किंवा मराठा सेवा संघाच्या रितसर सदस्य आहात काय? या वाचक भावासोबत झालेला माझा संवाद मी आपणा सर्वांसाठी देत आहे.

वाचक भाऊ - ताई तुम्ही संभाजी ब्रिगेडच्या किंवा मराठा सेवा संघाच्या आहात का?
मी - नाही भाऊ. मी एक लेखिका आहे. मनाला ज्या गोष्टी खुपतात त्यावर मी लिहिते. जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या ‘‘भेदाभेद भ्रम अमंगळ''  या वचनाला प्रमाण मानून मी लेखन करीत असते. पण तुम्हाला हा प्रश्न का पडला?
वाचक भाऊ - तुमच्या अनेक पोस्टमध्ये मला जय जिजाऊ, जय शिवाजी दिसते. म्हणून मला हा प्रश्न पडला.
मी - भाऊ, ज्या माऊलीने शिवबासारख्या सिंहाला  जन्म दिला, ती देवी सर्व  देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे. तिचा आणि तिच्या सुपुत्राचा जयघोष महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाने केला पाहिजे, असे माझे मत आहे. असेच लक्षावधी सजूतदार लोकांचे मत आहे. म्हणून मी जय जिजाऊ, जय शिवराय  लिहिते.
वाचक भाऊ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरही याच महाराष्ट्राच्या मातीचे सुपूत्र आहेत, मग तुम्ही जयभीम म्हणाल का?
मी - म्हणाल का? अहो मी जयभीम म्हणते. अभिमानाने म्हणते. महाराष्ट्राची माती रत्नांची खाण आहे. त्यातलेच एक रत्न म्हणजे डॉ. आंबेडकर.
वाचक भाऊ - ताई, तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीचा एवढा अभिमान आहे, तर तुमच्या एकाही पोस्टमध्ये मला जय महाराष्ट्र दिसून आले नाही, असे का? ताई तुम्ही ''जय महाराष्ट्र'' म्हणाल का?
मी - प्रिय भाऊ आपल्या या संभाषणात मला हाच प्रश्न सगळ्यांत महत्त्वाचा वाटतो. मी जय महाराष्ट्र म्हणायचे की नाही, हे माझ्या कोण बोलते यावर अवलंबून असेल.
वाचक भाऊ - म्हणजे? मला कळले नाही.
वाचक मी- शिवसेनेचा माणूस जर मला जय महाराष्ट्र म्हणाला तर मी मुळीच जय महाराष्ट्र म्हणणार नाही.
वाचक भाऊ - कारण?
मी - कारण की, शिवसेना आणि ठाकरयांनी शिवाजी महाराजांची जेवढी बदनामी केली, तेवढी कोणीही केली नाही. जय भवानी, जय शिवाजी म्हणून राडेबाजी करणे कितपत योग्य आहे. जय भवानी जय शिवाजी म्हणून मशीद पाडणे कितपत योग्य आहे. महाराजांनी कधी कोणती मशीद पाडली नाही. जय भवानी जय शिवाजी म्हणत महाराष्ट्राबाहेरून आलेल्या गोरगरिबांवर हल्ले करणारे हात शिवसेनेचेच होते. हे गोरगरीब शिवरायांची कोणती प्रतिमा घेऊन आपल्या प्रांतात गेले असतील? जेम्स लेनला मदत करणारया बहुलकरादी कपट-कारस्थानी ब्राह्मणवाद्यांना पाठींबा  देणारी शिवसेनाच होती. बहुलकरांच्या घरी जाऊन माफी मागणारे नेते शिवसेनेचेच होते.
जय भवानी जय शिवाजी म्हणून मराठ्यांच्या, बहुजनांच्या पोरांना नादी लावून गुंडगिरी करायला लावण्याचे पाप शिवसेनेने केले. मराठ्यांच्या, बहुजनांच्या पोरांनी रस्त्यावर उतरून राडेबाजी करायची. प्रसंगी जीव द्यायचा. पोलिस केसेस अंगावर घेऊन आयुष्य बरबाद करून घ्यायचे. ठाकरयांनी मात्र आपण आणि आपली मुले बाळे ''झेड दर्जा''च्या सुरक्षेत सुरक्षित ठेवायची. १५० शहिद शिवसैनिकांचा टेंभा मिरविणारया शिवसेना नेत्यांना माझा एकच सवाल आहे. या १५० शहिदांत एक तरी ठाकरे आहे का?
या लोकांनी शिवरायांना आणि महाराष्ट्राला कलंक लावला आहे. शिवसेना वाल्यांनो,  परप्रांतीयांवर हल्ले करा. राडे करा. काय करायचे ते करा.  पण हे करताना जय भवानी, जय शिवाजी म्हणू नका. महाराजांनी गोरगरिबांवर हल्ले केले नाहीत, हे लक्षात ठेवा...

म्हणून, म्हणून म्हणते भाऊ, मी या लोकांसाठी जय महाराष्ट्र म्हणणार नाही! महाराष्ट्राबद्दल माझ्या मनातील सर्वोच्य स्थान तरीही कायमच राहील. 

No comments:

Post a Comment