Tuesday 27 September 2011

ब्राह्मणांनाच का मिळतात ज्ञानपीठ पुरस्कार?


वि. स. खांडेकर
मराठीच्या वाङ्मयीन इतिहासात तीन जणांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लेखकाची एकूण लेखन कारकिर्द लक्षात घेऊन हा पुरस्कार दिला जातो. तथापि, त्या लेखकाची सर्वोच्च कलाकृती गृहीत धरण्याची प्रथा आहे. मराठीत पहिला पुरस्कार मिळाला १९७४ साली वि. स. खांडेकर यांना. त्यासाठी ययाती ही त्यांची कादंबरीसाठी सर्वोच्च म्हणून गृहीत धरली गेली. १९८७ साली दुसरया ज्ञानपीठाचे मानकरी ठरले वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. त्यांच्या नटसम्राट या नाटकासाठी त्यांची निवड झाली. तिसरे ज्ञानपीठ २००३ साली विंदा करंदीकर यांना मिळाले. त्यांचा अष्टपदी हा काव्यसंग्रह त्यासाठी गृहीत धरण्यात आला. मराठीतले हे तिन्ही ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक जातीने ब्राह्मण आहेत. तिघांच्याही आडनावात शेवटी ‘कर'  आहे. ब्राह्मणांशिवाय इतर कोणत्याही लेखकाला ज्ञानपीठ द्यायचे नाही, असेच एक अघोषित सूत्र या पाठीमागे दिसून येते.
तिन्ही कलाकृती आधारित 
वि. वा. शिरवाडकर
यातील आणखी एक गंमत अशी की, या तिन्ही लेखकांची ज्ञानपीठ प्राप्त पुस्तके आधारित आहेत. महाभारत आणि इतर अनेक पुराणांत असलेल्या राजा ययातीच्या कथानकावर खांडेकरांची ययाती ही कादंबरी  बेतली आहे. ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा अशा त्रिकोणी स्त्रिपुरूष संबंधांचे मूळ कथानक कादंबरीत जसेच्या तसे बेतले आहे. मूळ कथानकाच्या चौकटीला खांडेकरांनी काल्पनिक प्रसंगांत बसविले. ही जी काही काल्पनिक प्रसंगांची निर्मिती आहे, तेवढीच काय ती खांडेकरांची प्रतिभा. शिरवाडकरांच्या नटसम्राटाची कहाणी यापेक्षा वेगळी नाही. नटसम्राट ही एक शोकांतिका आहे. शोकांतिकामध्ये कथानकातील नायकाचा कारुण्यपुर्ण, शोकात्म अंत होत असतो .  जागतिक वाङ्मयात शोकांतिकांचे दोन प्रकार पडतात. ग्रीक शोकांतिका आणि शेक्स्पिअरच्या शोकांतिका. ग्रीक शोकांतिकांमध्ये नायक दैवाधीन असतो. त्याचे स्वत:चे प्राक्तन (नशीब) त्याला शोकांतिकेकडे घेऊन जाते. इडिपस रेक्स हे ग्रीक शोकांतिकेचे सर्वोच्च उदाहरण होय. पु. ल. देशपांडे यांनी इडिपस रेक्सचे राजा औदिपस या नावाने भाषांतर केले आहे. शेक्स्पिअरने शोकांतिकांचा नवा प्रकार निर्माण केला. त्याच्या नाटकातील नायकाचा शोकात्म अंत होतो, पण त्यासाठी तो स्वत:च जबाबदार असतो. राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला हे नाटक शेक्स्पीअरच्या शोकांतिकेत मोडते. एकच प्यालातील सुधाकराला आपल्या ज्ञानाचा एवढा ताठा असतो की, तो थोडासाही अवमान सहन करू शकत नाही. त्यातून तो दारूच्या आहारी जाऊन शेवटी बचनाग हे विषारी औषध घेऊन आत्महत्या करतो.
विंदा करंदिकर
शिरवाडकरांचे  नटसम्राट समजून घेण्यासाठी ही थोडीसी पाश्र्वभूमी सांगितली. नटसम्राट हे नाटक दोन्ही प्रकारच्या शोकांतिकांचा अर्क काढून शिरवाडकरांनी लिहिले. त्याचे कथानक ग्रीक शोकांतिकेच्या अंगाने जाते. तर भाषाशैली शेक्स्पीअरच्या अंगाने जाते. म्हातारी माणसे पोटच्या लेकरांनाच कशी नकोशी होतात, असे कथानक या नाटकात आहे. अप्पासाहेब बेलवलकर हे मुख्य पात्र. त्याचा नाटकाच्या शेवटी करुण अंत होतो.
विंदा  करंदीकरांच्या अष्टपदीचेही तसेच. या काव्याची प्रेरणा ही मूळ संस्कृतातून घेण्यात आली आहे.
अस्सल कलाकृतींवर अन्याय
नामदेव ढसाळ
अशा प्रकारे आधारित कलाकृतींना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन मराठीतील अस्सल कलाकृतींवर घोर अन्याय करण्यात आला आहे. साहित्यक्षेत्रातील ब्राह्मणी जातीवाद हेच एकमेव कारण यामागे आहे. मराठीत अनेक लेखक असे आहेत की, त्यांची प्रत्येक कलाकृती ज्ञानपीठ पुरस्काराच्या तोडीची आहे. अगदी मोजकी उदाहरणे येथे देते - माझे विद्यापीठ - नारायण सुर्वे, बलुतं- दया पवार, नामदेव ढसाळ - गोलपीठा. उपरा- लक्ष्मण माने, उचल्या- लक्ष्मण गायकवाड,  झुलवा - उत्तम बंडू तुपे, तराळ-अंतराळ - शंकरराव खरात, वळीव - शंकर पाटील, खळाळ - आनंद यादव, पाचोळा - रा. रं. बोराडे, धग - उद्धव ज. शेळके, कोसला - भालचंद्र नेमाडे. ई. ई. ही यादी खूप मोठी होऊ शकेल;
भालचंद्र नेमाडे 
परंतु विस्तारभयास्तव अगदी मोजकी उदाहरणे मी येथे दिली आहेत.
प्र. ई. यांचे एकच पुस्तक हजार ज्ञानपीठाच्या तोडीचे
आमच्या औरंगाबादचे प्र. ई. सोनकांबळे यांना तर त्यांच्या ‘आठवणींचे पक्षीङ्क या एकाच कलाकृतीसाठी हजार ज्ञानपीठे मिळायला हवी होती. नारायण सुर्वे, ढसाळ, दया पवार आणि नेमाडेंबद्दलही माझे हेच मत आहे. परंतु यापैकी कोणालाही ज्ञानपीठ मिळू शकले नाही. कारण हे लोक जातीने ब्राह्मण नव्हते. याच कलाकृती ब्राह्मणांच्या नावे असत्या तर मराठी साहित्यात क्षेत्रात त्यांना मानाच्या पालख्या मिळाल्या असत्या.
सावंत, देसाइंवरही अन्याय
शिवाजी सावंत 
आणखी एक मुद्दा येथे नमूद करावासा वाटतो की, आधारित कलाकृतींसाठीच पुरस्कार द्यायचा असे ठरविले गेले असेल, तर शिवाजी सावंतांना मृत्यूंजयसाठी ज्ञानपीठ मिळायलाच हवे होते. मराठीतील आधारित कलाकृतींत मृत्यूंजय ही सर्वांत श्रेष्ठ कलाकृती आहे. रणजीत देसाई यांनाही श्रीमान योगी हा पुरस्कार मिळायला हवा होता. दुर्दैवाने ते ब्राह्मण नव्हते, म्हणून ते ज्ञानपीठापासून वंचित राहिले.
....................................................................................................

ता. क. 
भावांनो, आणि बहिणींनो,
रा. रं. बोराडे. 
या माझ्या लेखावरून फेसबुकच्या व्यासपीठावर घणाघाती चर्चा झाली. ब्राह्मणवाद्यांना हा लेख भयंकर झोंबला. ‘खांडेकर-शिरवाडकर-करंदीकर या त्रिमूर्तीला ज्ञानपीठ मिळाले ते केवळ त्यांच्या गुणवत्तेमुळे' असा युक्तीवाद त्यांनी केला. मी त्यांना एकच सवाल होता - नारायण सुर्वे, दया पवार, नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, उत्तम बंडू तुपे, शंकरराव खरात, शंकर पाटील, आनंद यादव, रा. रं. बोराडे, उद्धव ज. शेळके, भालचंद्र नेमाडे, प्र. ई. सोनकांबळे, शिवाजी सावंत, रणजीत देसाई यांच्यात गुणवत्ता नाही काय? त्यावर ब्राह्मणवाद्यांनी सारवासारक केली.
या देशात फक्त ब्राह्मण राहतात काय?
१२० कोटींचा देश आहे. या देशात केवळ ब्राह्मणच राहतात, असे नव्हे. इतरही जाती-जमाती आहेत. सर्वांना न्याय मिळायला हवा. बहुजन, दलित, आदिवासी यांना न्याय्य हक्कही नाकारण्यात आले आहेत. नाकारण्यात येत आहेत. जेव्हा जेव्हा न्यायाची मागणी केली गेली, तेव्हा तेव्हा ‘गुणवत्तेङ्कचा मुद्दा ब्राह्मणांकडून पुढे करण्यात येतो. ब्राह्मण सोडून इतर कोणातही गुणवत्ता नाही, असा युक्तीवाद केला जातो.
यालाच तर ब्राह्मणवाद म्हणतात.


अनिता पाटील, औरंगाबाद. 
......................................................................................

8 comments:

  1. अगदी बरोबर आहे .में शाळेत असताना,एक शिक्षिका ब्रम्हाण लोकांचिच स्तुति करत असे कारन नसताना .पण बहुजन लोकाची स्तुति करने जड़ जात असे.

    ReplyDelete
  2. अनिता पाटील विचार मंच मधील सर्वच लेख खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. मागील अनेक वर्षापासून मी कवितासागर हे आंतरराष्ट्रीय नियतकालिक चालवतो, कवितासागर च्या अंकाला जगभरातून वाचकवर्ग असून कवितासागर ला अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून. पहिले व एकमेव आंतरराष्ट्रीय कविताविषयक नियतकालिक म्हणून इंडिया बुक ऑफ रेकोर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकोर्ड कडून कवितासागरचा नुकताच सन्मान करण्यात आला असून, माझ्या नियतकालिकात जोशी - देशपांडे - कुलकर्णी दाखवा आणि १० रुपये बक्षीस मिळावा असे माझे आवाहन आहे, थोडक्यात माझ्या नियतकालिकात बडव्याना प्रवेश नाही. कदाचित बडव्यांच्या सहभागा शिवाय चालविण्यात येणारे हे एकमेव नियतकालिक असेल. तात्पर्य असे की अनिता पाटील विचार मंच वरील काही किंवा सर्वच लेख आम्ही संबंधित लेखकाच्या नावासह व अनिता पाटील विचार मंच वरून साभार असा स्पष्ट उल्लेख करून पुनर्प्रकाशित करू इच्छितो तरी कृपया आपण आमची विनंती मान्य करून आम्हांस तशी परवानगी द्यावी. या विषयाला अनुसरून आपणास जर काही सुचवायचे असल्यास आपले स्वागत आहे. आपल्या सहकार्य व प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.

    डॉ सुनील पाटील,
    प्रकाशक,
    कविता सागर प्रकाशन,
    सुदर्शन, प्लॉट # १६, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड,
    जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र
    मोबाईल - ९९७५८७३५६९, ०२३२२ २२५५००
    sunildadapatil@gmail.com

    ReplyDelete
  3. तुम्ही लेख छापू शकता. 'अपाविमं'वरील लेख कॉपी राईट मुक्त आहेत.

    ReplyDelete
  4. सन्माननीय महोदय,

    आपल्या प्रतिसादा बद्दल आम्ही आपले मन:पूर्वक आभारी आहोत, अनिता पाटील विचार मंच वरील काही लेख आम्ही आमच्या पुढील अंकात प्रसिद्ध करीत आहोत. अंक प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची लिंक किंवा छापील प्रत आपल्याला पाठवू. आपण करत असलेल्या विधायक कामासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा...

    डॉ. सुनील दादा पाटील

    ReplyDelete
  5. अगदी बरोबर आहे ताई ह्या समाजात अजून चांगले साहित्य लेखन झालेले आहे मग त्यांच्यावर अन्याय का ..?
    उत्तर अगदी बरोबर आहेत कि ते ब्राम्हण नाही......

    जीवन सोनवणे

    ReplyDelete
  6. वा हे खूप महत्वाचे आहे की आपण आपले विचार अनेक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कॉपी राईट ची आडकाठी नाही मी ही इथले अनेक लेख आमच्या व्हाटस अप ग्रुप वर शेअर करणर् आहे

    ReplyDelete
  7. प्रा.नेमाडे यांना ज्ञानपीठ मिळाले की ! कदाचित या लेखानंतर चूक सुधारली असेल तरी बदल होत जाईल हे आशादायक नाही काय?

    ReplyDelete