Tuesday 2 April 2013

पांडुरंगशास्त्री आठवल्यांकडून तुकोबांविषयी खोटारडा प्रचार

...म्हणे तुकाराम महाराजांपासून इश्वर दूरच राहिला

राजा मइंद


पांडुरंगशास्त्री आठवल्यांनी दशावतारावर अनेक प्रवचने दिली. त्याचे संकलन ‘दशावतार' या नावाच्या पुस्तकात स्वाध्याय परिवारातर्फे करण्यात आले आहे. माझ्याकडे या पुस्तकाची ऑगस्ट १९८९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली दुसरी आवृत्ती आहे. स्वाध्याय परिवारातर्फे चालविल्या जाणा-या सद्विचार दर्शन ट्रस्टतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकातील प्रत्येक पान जातीय ब्राह्मणवादी विचारांनी भरलेले आहे. या पुस्तकात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची कुत्सित शब्दांत हेटाळणी करण्यात आली आहे. ही हेटाळणी कुटाळकीच्या पातळीवरची आहे.  तुकोबांनी आठ-आठ जन्म घेऊनही ईश्वर त्यांच्यापासून दूरच राहिला, असा खोटा प्रचार आठवले करतात.

पुस्तकातील ‘अवतार मीमांसा' नावाच्या पहिल्याच प्रकरणात हा प्रकार आठवल्यांनी केला आहे.  या विवेचनातील आठवल्यांचे शब्द पुढील प्रमाणे आहेत : 

...ट्रान्समायझेशन म्हणजे म्हणजे उत्क्रांतीवादाच्या पद्धतीने विकास करीत दिव्यमानव बनून मनुष्याने वर येणे. उदाहरणार्थ, तुकाराम महाराज आठ आठ जन्म घेऊन स्वत:चा विकास करीत राहिले, परंतु ईश-चैतन्य मात्र स्वत: दूरच उभे राहिले.१

किती ही थापेबाजी? तुकोबांना इश्वराचे दर्शनच झाले नाही, असे विवेचन करून आठवले तुकोबांचा घोर अपमानच करतात. तुकोबांना इश्वराचा साक्षात्कार झाला होता. त्या विषयीचे शेकडो अभंग त्यांच्या गाथ्यात आहेत. ‘अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा' अशी तुकोबांची अवस्था झाली होती. पण, त्याकडे आठवलेबुवा सोयीस्कर दुर्लक्ष करतात. 

वारकरी धर्माविरोधात ‘स्वाध्याया'चे कारस्थान
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विषयी, असा अवमानकारक अपप्रचार करून पांडुरंगबुवांना आठवल्यांना काय साध्य करायचे होते? वारकरी सांप्रदायाने महाराष्ट्रात वैदिक धर्मातील विषमते विरुद्ध बंड पुकारले. धार्मिक क्षेत्रात समतेचा झेंडा रोवला. आज वारकरी सांप्रदाय महाराष्ट्राचा मुख्य धर्म आहे. वारकरी धर्माचा थेट फटका ब्राह्मणांना बसला. धर्मक्षेत्रातील ब्राह्मणांच्या एकाधिकारच वारकरी संतांनी प्रहार केले. त्यामुळे विषमतावादी ब्राह्मणी विचारांचा पुरस्कार करणा-यांचा वारकरी सांप्रदायावर विशेष राग आहे. वारकरी धर्मातील प्रत्येक संताला ब्राह्मणांनी छळले. ज्ञानेश्वरापासून तुकोबापर्यंत सर्वच संतांना ब्राह्मणांच्या या छळाला तोंड द्यावे लागले. वारकरी संत मात्र ब्राह्मणांपुढे झुकले नाही. वारक-यांचा समतेचा विचार मारला जाऊ शकला नाही. त्यामुळेच वारकरी धर्म हा महाराष्ट्राचा मुख्य धर्म बनू शकला. 

थेट विरोध करून वारक-यांचा विचार संपविला जाऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर विषमतावादी ब्राह्मणी विचारांच्या पुरस्कत्र्यांनी आता छुप्या पद्धतीचा अवलंब सुरू केला आहे. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी उभा केलेला स्वाध्याय परीवार याच मार्गाने चालला आहे. महाराष्ट्रातील समतावादी वारकरी विचार संपवून विषमतावादी जातीय विचार रुजविणे हेच स्वाध्याय परिवाराचे मुख्य लक्ष्य आहे. पांडुरंगशास्त्री आठवल्यांच्या पुस्तकातील उतारे पाहिले की, स्वाध्याय परिवाराचा छुपा अजेंडा लक्षात येतो. 


संदर्भ : 
१. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. ६ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई.




1 comment:

  1. मी स्वाध्याय चा समर्थक नाही. शास्त्री च्या दशावतार ह्या पुस्तकाचा कडाडून विरोध करतो परंतु [ तुकाराम महाराज आठ आठ जन्म घेऊनस्वत:चा विकास करीत राहिले, परंतु ईश-चैतन्य मात्र स्वत: दूरच उभे राहिले.]१ह्या वाक्याचा संदर्भांसह अर्थ पहिले तर ....तुकाराम महाराज आठ आठ जन्म घेऊन.... ईश्वर आपली लीला करत .. ईश-चैतन्य मात्र [ स्वत:] दूरच उभे राहिले.
    कारण तुकोबाराय समर्थ होते असा अर्थ होतो इतर ठिकाणी मत्र नक्कीच मुर्खपणा केला आहे

    ReplyDelete