Wednesday 2 May 2012

मियाँ तानसेन

प्रख्यात चित्रकार लाला देवलाल यांनी
काढलेले मिया तानसेन याचे चित्र.
....................................................................................

ब्राह्मण कधीही जातीमुक्त होऊन नि:पक्ष इतिहास लिहू शकत नाहीत, हे वारंवार सिद्ध होत आले आहे. मोगलांचा इतिहास लिहितानाही ब्राह्मणी इतिहासकारांचा हाच पक्षपात समोर येतो. मोगल सम्राटांची अत्यंत क्रूर अशी प्रतिमा ते उभे करतात. राजपुतान्यातील राजपुतांनी मोगलांना मुली दिल्या म्हणून राजपुतांची ते घोर शब्दांत निर्भत्सना करतात. मोगलांनी हिन्दूंचे (ब्राह्मण सोडून इतर जातींबाबत) जबरदस्तीने इस्लामीकरण केले, अशी खरी-खोटी चित्रे रंगवितात. परंतु, त्याकाळातील अनेक ब्राह्मण विद्वान स्वखुषीने मोगलांच्या आश्रयाला गेले. ब्राह्मणांनी इस्लामचा नुसताच स्वीकार केला नाही, तर प्रसारही केला. त्याबदल्यात मोगलांकडून मानमरातब, पैसा, जहागिèया मिळविल्या. मात्र, हा सर्व इतिहास लिहिणयचे ब्राह्मण इतिहासकार टाळतात. माझ्या नव्या मालिकेत मी हाच इतिहास मांडणार आहे. 

गौड ब्राह्मण तन्ना मिश्र

या लेखमालेची सुरुवात गौड ब्राह्मण तन्ना मिश्र याच्यापासून करूया. हा कोण तन्ना मिश्र? असा प्रश्न वाचकांना नक्कीच पडला असेल. मोगल सम्राट अकबराच्या दरबारातील महान गायक मियाँ तानसेन म्हणजे तन्ना मिद्ध होय! संपत्ती आणि मानमरातबासाठी तन्नाने आपला ब्राह्मण धर्म सोडला. तो मुसमान झाला. इस्लाम त्याच्या अंगात इतका भिनला होता की, आपल्या मुसलमानी गुरुच्या शेजारीच त्याने हट्टाने स्वत:चे दफन करवून घेतले. 


मियाँ तानसेन याचा जन्म मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जवळच्या बेहर या गावात झाला. त्याच्या पित्याचे नाव मकरंद पांडे असे होते. मकरंद पांडेच्या वंशात मिश्र हे आडनाव लावणयाचीही वहिवाट होती. मकरंद पांडेला १५२० ते ३० या काळात एक मुलगा झाला. त्याचे नाव तन्ना असे ठेवण्यात आले. हाच तन्ना पुढे मिया तानसेन या नावाने जगप्रसिद्ध झाला. तन्नाच्या जन्माबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. मकरंद पांडेला मूल होत नव्हते. तो आणि त्याची पत्नी अनेक वैद्य आणि संत-महंतांना भेटले. पण गुण आला नाही. ग्वाल्हेरमध्ये महंमद गौस नावाचा एक सुफी फकीर तेव्हा राहत होता. हे जोडपे गौसकडे गेले. गौसने आशीर्वाद दिला. खरोखरच वर्षभराच्या आत त्यांना मुलगा झाला. हाच मियाँ तानसेन होय. धर्मगुरू या नात्याने धर्मरक्षणाची जबाबदारी त्या काळी ब्राह्मणांची होती. ते करायचे सोडून ब्राह्मण मंडळी स्वत:च सुफी फकिरांच्या नादाला लागलेली होती, हे मकरंद पांडेच्या कहाणीवरून स्पष्ट व्हावे.

स्वामी हरिदासांचे शिष्यत्व

तन्ना लहान असतानाच त्या काळातील महान गायक स्वामी हरिदास याची नजर तन्नावर पडली. त्याचा आवाज स्वामीने हेरला. तो त्याला सोबत घेऊन गेला. तन्नाने स्वामीकडे १० वर्षे संगीत साधना केली. या काळात संपूर्ण भारतीय शास्त्रीय संगीत शिकला. शिक्षण संपल्यानंतर तन्ना मिश्र घरी परतला. रिवा संस्थानचा राजा राजाराम याने तानसेनाला राजाश्रय दिला. राजा राजाराम हा मोगल सम्राट अकबराचा मांडलिक होता. एका आख्यायिकेनुसार, राजारामाने तानसेनाला अकबराच्या दरबारात पाठवले, असे मानले जाते. दुसèया एका सम्राट अकबराच्या वैभवाच्या कथा ऐकून तानसेन मोहीत झाला आणि तो स्वत:च राजारामाला सोडून अकबराकडे. काहीही असो, तानसेन अकबराच्या दरबारात आला हे महत्वाचे. त्याची गायकी पाहून अकबराने त्याला नवरत्नांत स्थान दिले. 

इस्लामचा स्वीकार

तानसेनाने इस्लामचा स्वीकार का आणि कसा केला, याबाबतही अनेक आख्यायिका आहेत. तानसेनाने अकबराला खुष करण्यासाठी इस्लामचा स्वीकार केला, असे काही जण मानतात. यासंबंधी आणखीही एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. गायकीत परिपूर्णता मिळविल्यानंतर तन्ना मिश्रचे कुटुंबिय त्याला ग्वाल्हेरचा फकीर महंमद गौस याच्याकडे घेऊन गेले. (गौसच्या आशीर्वादाने तानसेनाचा जन्म झाला होता, हे आपण वर पाहिलेच.) तानसेनाचे गाणे ऐकून फकीर गौस प्रसन्न झाला. त्याने आपल्या तोंडातील उष्टे पान तन्ना मिश्रला खायला दिले. ते खाल्यानंतर तानसेन मुसलमान झाला. कोणी म्हणतात, गौसने त्याला जबरदस्तीने मुसलमान केले. तथापि, जबरदस्ती धर्मांतराच्या आख्यायिका तथ्यहीन दिसतात. कारण तानसेन रस्त्यावरचा गायक नव्हता. तो रिवा संस्थानचा दरबारी गायक होता. त्याची जबरदस्ती सुंता होणे शक्यच नव्हते. गौसने उष्टे पान खायला देऊन तानसेनाचे जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणले, हे खरे असते तर तानसेनाने आपले दफन गौसच्या शेजारी करवून घेतले नसते. खरे म्हणजे तानसेनला घडविण्याचे सारे श्रेय स्वामी हरिदासाला जाते. स्वामी हरिदासाने तानसेनाला गायकी शिकवली नसती, तर तो अकबराच्या दरबारात जाण्याच्या लायकीचा झालाच नसता. स्वामीचे हे उपकार मात्र, मिया तानसेन पूर्णत: विसरून जातो. नंतरच्या काळात तो हरिदासाचे नावही घेत नाही. तानसेनाला आपल्या मूळ धर्माबद्दल खरोखरच आस्था असती, तर त्याने चिरशांतीसाठी स्वामी हरिदासाचा आश्रम निवडला असता. किमान गौसच्या शेजारी तरी जागा मागितली नसती. येथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, मोगल काळात ब्राह्मण विद्वान दिल्लीच्या आश्रयास जाण्यास आतूर असत. जगन्नाथ पंडिताचे ‘दिल्लीश्वरोवा सर्वेश्वरोवाङ्क ही उक्ती त्यासाठी लक्षात घेण्याजोगी आहे. अतएव, तानसेनाचे इस्लामला शरण जाणे हा स्वखुषीचा मामला होता, हेच खरे. 

तानसेनचे इस्लाम प्रेम

तानसेनाला इस्लाम धर्माबद्दल विशेष आस्था होती, असे त्याच्या पुढील सांगितिक कारकिर्दीवरून दिसून येते. त्याने त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या रागांत फेरफार करून नवे राग बनविले. तानसेनाला दरबारात मियाँ तानसेन असे संबोधले जाई. मियाँ हे संबोधन तानसेनाला अतिप्रिय होते. स्वत: बनविलेल्या नव्या रागांच्या नावापुढे तो मियाँ लावीत असे. उदा. मल्हार रागात फेरफार करून तानसेनाने मियाँ मल्हार बनविला. सारंगमध्ये फेरफार करून मियाँ की सारंग बनविला. याशिवाय मूळच्या कानडा रागात फेरफार करून तानसेनाने अकबराच्या दरबारासाठी दरबारी कानडा हा राग तयार केला. सम्राट अकबराची सेवा करण्यात मियाँ तानसेनाने आपले संपूर्ण जिवित खर्ची घातले. त्याचे त्याला फळही मिळाले. त्याच्या कित्येक पिढ्यांची सोय अकबराने करून दिलसी. तानसेन हा धृपद शैलीचा उद्गाता समजला जातो. इस्लामधर्म स्वीकारण्याच्या आधी, राजारामाच्या दरबारात असताना, त्याने धृपद गायकी शोधली असावी असे मानण्यास जागा आहे. तानसेन गौड ब्राह्मण होता. त्यावरून त्याची धृपद गायकी अजूनही गौड धृपद या नावाचे प्रसिद्ध आहे. ही शैली त्याने अकबराच्या दरबारात रुजू झाल्यानंतर निर्माण केली असती, तर तिचे नाव निश्चितच मियाँ धृपद असे पडले असते. 

ग्वाल्हेरमधील मियासेन याची भव्य कबर. या कबरीच्या बाजूलाच
मियाँ तानसेनचा सुफी गुरू महंमद गौस याची कबर आहे.
...................................................................................................

ग्वाल्हेरात गौच्या शेजारी चिरविश्रांती

फेब्रुवारी १५८५ मध्ये मियाँ तानसेनाचे निधन झाले. आपला अध्यात्मिक गुरू महंमद गौस याच्या कबरीशेजारीच आपल्याला दफन करण्यात यावे, अशी मियाँ तानसेनाची इच्छा होती. त्यानुसार ग्वाल्हेरला मंहमद गौसच्या कबरी शेजारीच त्याचे दफन करण्यात आले. या ठिकाणी दरवर्षी मोठा उरुस भरतो. भारतातील शास्त्रीय संगितातील दिग्गज मंडळी येथे येऊन आपली गायकी पेश करतात. 

मियाँ तानसेनाचा वारसा

तानसेनाची सर्व मुले उत्तम गायक होती. त्याचा एक मुलगा विलास खाँ याने तोडी या स्वतंत्र गायकीची सुरुवात केली. मियाँ तानसेनाच्या प्रेरणेने अनेक विद्वान ब्राह्मण गायकांनी इस्लामचा स्वीकार केला. तसेच त्याने मुस्लिम गायकांनाही भारतीय शास्त्रीय संगीत शिकवले. भारतीय शास्त्रीय संगितात आज अनेक मुस्लिम घराणी दिसतात. त्यांचा कुठे ना कुठे थेट मियाँ तानसेनाशी संबंध येतो. 

अनिता पाटील

No comments:

Post a Comment